नाटक : अंत अस्तित्वाचा
लेखक व दिग्दर्शक: नरेंद्र कोंगारी
संस्था: ओंकार नाट्य मंदिर, सोलापूर
अंत अस्तित्वाचा: शोध मानवी मूल्यांचा
Lokmat Epaper Link: Link (Click on the link)
मानवाने धर्म, संस्कृती, भाषा , संस्कार आणि काही मूल्यसंस्था समाजजीवन सुकर करण्यासाठी निर्माण केल्या. मानवी मन हे फार कमी वेळा समाधानी असतं. मानवी मनाचा हव्यास वाढत जातो, आणखी जास्त मिळवण्याच्या नादात ती व्यक्ती मित्र, नातेवाईक, परिवार आणि रक्ताची नाती सुध्दा हव्यासा पोटी गमावून बसतात. याची परिणीती म्हणजे आपण आपलं स्वत्व गमावून बसतो. या लोभाचा आणि हव्यासाचा प्रवास व्यक्तीस अस्तित्वाच्या अंतापर्यंत घेऊन जातो.
अंत अस्तित्वाचा या नाटकांमध्ये एक स्वतंत्र कबिला,यांची एक संस्कृती, कुलदैवत ,भाषा, वेशभूषा , विशिष्ट जगण्याची पद्धती, संस्कार ,जीवन मूल्य आणि स्वसंरक्षणासाठी त्यांनी विकसित केलेली युद्धपद्धती आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या पलीकडे असणारी एक रंजकता देखील यांच्या जगण्यामध्ये आहे. या स्वतंत्र नाट्यविश्वाची निर्मिती नरेंद्र कोंगारी यांनी अंत अस्तित्वाच्या या नाटकात केली आहे. दोन कबिले यामधील युद्ध, जंगल, यातील गूढता, मंत्र तंत्र विद्या, प्रेम, श्रद्धा आणि मूल्यसंघर्ष या सर्व भावभावनांचे एकत्रित सादरीकरण म्हणजेच अंत अस्तित्वाचा. सत्याचा असत्यावर झालेला विजय हा आनंद प्रयत्नांती पराकाष्ठेचा..!! हा विजय कधी सुखांत करतो तर कधी शोकांतिका.
मालंबूरा व नीलांबरी यांचे लग्न होणार आहे. सरदार आणि राणी सरकार यांची मुलगी निलांबरी. मालंबूरा त्यांचा भाचा. शूलकिंकराचा पराभव करून त्याचा कडेलोट करण्यात येतो. मालंबूरा लग्नासाठी तयार होतो. अधिक शक्तिशाली होण्यासाठी, अघोरी विद्या शिकण्यासाठी मालंबूरा जंगलामध्ये जातो. कबिल्यामध्ये अघोरी विद्या शिकणे मान्य नसते. त्यामुळे मालंबूराला हद्दपार करण्यात येते. सुडाने पेटून उठला मालंबूरा अघोरी साधू आणि शूलकिंकर यांच्यामुळे अधिकच लोभी आणि हिंस्र होत जातो. मालंबूरा अपमानाचा बदला घेण्यासाठी सरदार, राणीसरकार, कबिल्यातील सदस्य यांना संपवतो. वीर मालंबूराला युद्धामध्ये हरवतो, परंतु निलांबरी वीरला मालंबूराचा आत्मा समजून स्वीकारत नाही व विषप्राशन करते.
अंत अस्तित्वाचा या नाटकामध्ये 22 पेक्षा अधिक कलावंत रंगमंचावर होते. मालंबूरा (विकास सुरवसे), शूल किंकर (रमेश श्रावण), सरदार (संतोष दंडी), राणी सरकार (दीप्ती इंगळे) निलांबरी (आरती हनमगावकर) आणि वीर (नरेंद्र कोंगारी) या मुख्य भूमिका तर कबिलावासी म्हणून स्त्री, पुरुष दहा ते बारा कलावंत या प्रयोगात होते. मालंबूरा यांनी आपल्या भूमिकेतील यशस्वी सेनापती ते लोभी अघोरी हा संपूर्ण प्रवास व्यवस्थितरित्या रंगवला. शूलकिंकर या पात्राची आपल्या भूमिकेची समज आणि सादरीकरण हे वाखाणण्याजोगे होते.
राणीसरकार आणि तामुरा (रामचंद्र कानडे) यांनीही आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला. सरदार निलांबरी आणि वीर या पात्रांनी अधिक मेहनत घेणे गरजेचे होते. दिग्दर्शक नरेंद्र कोंगारी यांनी यावरती मेहनत घेणे गरजेचे होते असे वाटते.
या प्रयोगातील आणखी एक जमेची बाजू म्हणजे अघोरी एक (उमेश शेळके) आणि अघोरी दोन /योगी ( शैलेश वाडकर) यांनी प्रयोगामध्ये आणलेली रंजकता. अघोरी आणि त्यांचं तांत्रिक भावविश्व या दोन्ही पात्रांनी उत्तमरीत्या उभे केले होते. कपली (प्रशांत भोसले) , रासुका (शिवलिंग नारा) व कासुका ( सुंदरम दुधगुंडी) आणि सर्व कबिलावासी यांनी प्रयोगामध्ये उत्तम साथ दिली.
या प्रयोगासाठी वेशभूषा (नागमणी कोंगारी), रंगभूषा रमेश श्रावण) आणि नेपथ्य (उमेश शेळके) यावरती घेतलेली मेहनत दिसून येत होती. कबिलावासियांचा स्वतंत्र कपडेपट या नाट्यकृती च्या माध्यमातून निर्माण करण्यात आला होता. यातूनच त्यांची वेशभूषावरची मेहनत दिसून येत होती. मालंबूरा या पात्राची दोन्ही अंकांमधील रंगभूषा विविध बदलांसह स्पष्टपणे जाणवत होती. अघोरी, कपाली आणि कबिला वासी यांच्या साठीची स्वतंत्र रंगभूषा हीदेखील आणखी एक जमेची बाजू .
जंगलाची निर्मिती, कबिला, देवी मंदिर, कपाली यांची विशिष्ट जागा, यासोबतच तलवारी, भाले, ढाल या शस्त्रांची निर्मिती याचा नेपथ्यामध्ये योग्यरीत्या समावेश करण्यात आला होता. या सर्वांचा एकत्रित परिणाम प्रयोगामध्ये स्पष्टपणे जाणवत होता. नेपथ्य रचना बदलत असताना अधिक काळजी घेणे गरजेचे होते.
प्रकाश योजनेमध्ये रचना उत्तम करण्यात आली होती परंतु त्याचे संयोजन सादरीकरण सोबत एकत्रित होताना दिसून आले नाही. नेपथ्य रचनेस आवश्यक असणारा वेळ आणि त्यासोबत येणारी प्रकाश योजना यांचा ताळमेळ नसेल तर अंधारातील सर्व हालचाली प्रेक्षकांना स्पष्टपणे दिसतात. याचीही काळजी घेणे गरजेचे होते असे वाटते.
संपूर्ण प्रयोगाचा परिणाम संगीतामुळे( लक्ष्मीकांत बोम्मा) कमी झाला असेच म्हणावे लागेल. सिरीयल प्रमाणे संपूर्ण प्रयोगामध्ये कायम संगीत वाजत होते. पात्रांच्या संवादापेक्षा संगीताचा आवाज खूपवेळा अधिक होता. ध्वनी संयोजनाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष प्रयोगाची रंजकता वाढवण्यापेक्षा परिणाम कमी करताना दिसून आले. नरेंद्र कोंगारी यांनी दिग्दर्शक म्हणून वेषभूषा, नेपथ्य, रंगभूषा याबाबींवर ती घेतलेली मेहनत हे स्पष्टपणे दिसून येत होती.
नाट्यकृती मध्ये तांत्रिक बाजूसह रंगमंचीय सादरीकरण करणाऱ्या सर्व पात्रांच्या अभिनयाची तयारी करून घेणे खूप गरजेचे असते. संगीत, नेपथ्य बदल, रंगमंचीय वावर यावरती अधिक लक्ष केंद्रित केले असते तर प्रयोग अधिक यशस्वी झाला असता अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी नोंदवली.
प्रा.डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर
Share
सर नमस्कार
ReplyDeleteफार सुंदर व व्यवस्थित होत आहे.
परीक्षण ची स्वतःची शैली दिसून येते.
अमोल अरगडे.राजभाषा प्रकाशन.
अंबेजोगाई.
सर नमस्कार
ReplyDeleteफार सुंदर व व्यवस्थित होत आहे.
परीक्षण ची स्वतःची शैली दिसून येते.
अमोल अरगडे.राजभाषा प्रकाशन.
अंबेजोगाई.