नाटक: एम आय वन सेवंटी वन
लेखक : डॉ संजीव शेंडे
दिग्दर्शक: रत्नाकर जाधव
संस्था: बनशंकरी बहुउद्देशीय संस्था,सोलापूर
एम आय 171 : पराक्रमाची शौर्यगाथा
Lokmat Epaper Link: Link( Click on it)
भारतीय सैन्य आणि सैनिक आपल्या बलिदानामुळे आपल्या राष्ट्राची अखंडता अबाधित राखत असते. युद्धप्रसंगी काही सैनिक शत्रूच्या हाती लागतात. कागदोपत्री या सैनिकांना शत्रुसैन्याच्या खोटेपणामुळे मृत घोषित करावे लागते. परंतु आजही शत्रु राष्ट्राच्या छळ छावण्यांमध्ये आजही कित्येक सैनिक मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. शत्रु राष्ट्रामध्ये गुप्तचर म्हणून कार्यरत असणारे सैनिक जर पकडले गेले, तर त्यांचा अमानुष छळ केला जातो. हीच परिस्थिती आपण एमआय वन सेवन वन या नाट्यप्रयोगात अनुभवतो.
मेजर मल्होत्रा(अविनाश तमनूर), सत्यजित राय (डॉ संजीव शेंडे), कॅप्टन रणवीर (सुरज घम), दिग्विजय(राजू गायकवाड), बलविंदर(मकरंद जाधव), रूपसिंग (ऋतुराज आरसिद), इनायत (विपुल आरसिद ) हे युद्धकैदी व गुप्तचर संघटनेचे सदस्य. मागील दहा ते पंधरा वर्षांपासून शत्रु राष्ट्रांच्या कोठडीत युद्धकैदी परंतु सुटकेच्या प्रतीक्षेत.
युद्धभूमीवर चर्चा तर काही युद्ध प्रसंग ही या प्रयोगाची जमेची बाजू. मेजर मल्होत्रा आणि कॅप्टन रणवीर यांनी आपआपल्या भूमिकेस यथोचित न्याय दिला. पहिल्या अंकात मेजर नवाब (संतोष पाटील) प्रभावी झाला. गफूरखान / सैनिक 1 ( रत्नाकर जाधव) आणि आयुब खान / सैनिक 2 (गुरुनाथ ताटे) यांनीही आपली भूमिका व्यवस्थित रित्या पार पाडली.
गुप्तचर संघटनेचे तीन सदस्य शत्रु राष्ट्रातील सर्व विघातक कार्याची माहिती एकत्र करत असतात. या सर्वांचा मृत्यू कागदोपत्री घडून आला आहे,परंतु यांचा वापर मात्र गिनीपिग म्हणून जैविक शस्त्र आणि त्याची परिणामकारकता तपासण्यासाठी करण्यात येणार आहे.
अचानक हेलिकॉप्टर पडते, या सर्वांना सत्याची जाणीव होते. प्रत्येकजण आपापली वेदना बोलून दाखवतात शेवटी जैविक शास्त्र आणि त्याचा हल्ला रोखण्यात ही मंडळी यशस्वी होतात पण यासाठी त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते.
रंगमंचावर ती पाच ते सहा पात्र एकत्र असून देखील फारसे काही घडत नव्हते. दृश्य परिप्रेक्षात केवळ चर्चा नाट्य घडते आहे असे दिसून येत होते.
नाटकाची गती केवळ चर्चेच्या माध्यमातूनच कायम राखली असेच म्हणावे लागेल.
प्रयोगामध्ये वेशभूषा व रंगभूषा ( राजू गायकवाड) प्रकाश योजना (अमोल कुलकर्णी ), संगीत ( चेतन देडे) यांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली. दिग्दर्शक रत्नाकर जाधव यांनी यातील बारकावे अधिक तपशीलवारपणे शोधणे गरजेचे होते असे वाटते.
डॉ.संजीव शेंडे यांच्या संहितेमध्ये जे प्रसंग संवाद रूपाने होते , तेच प्रसंग रंगमंचीय झाले असते तर हा प्रयोग प्रभावी ठरला असता असे वाटते. "राष्ट्रभक्ती आणि सैनिकांचे बलिदान याबद्दल सर्वांनाच निर्विवादपणे अभिमान वाटतो." डॉ. शेंडे यांनी राष्ट्रभक्तीची भावना संहितेच्या माध्यमातून जागृत केली अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी नोंदवली.
प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर
Share
No comments:
Post a Comment