नाटक : शेवंता जित्ती हाय
लेखक: प्रल्हाद जाधव
दिग्दर्शक: डॉ. दिनेश कदम
संस्था: पंचशील सामाजिक मागास वर्गीय बहुउद्देशीय संस्था लवूळ तालुका माढा जिल्हा सोलापूर

शेवंता जित्ती हाय : कारण माणसांतल माणूसपण जिवंत हाय..!!
Lokmat Epaper Link: Link-Click on the link

सामान्य माणूस बऱ्याच वेळा अन्याय सहन करतो, परंतु एक वेळ अशी येते तेव्हा मात्र तो विद्रोहास प्रवृत्त होतो. अन्याया विरुद्धची चीड त्याला अस्वस्थ करते आणि न्यायासाठी,सत्यासाठी तो पोलिस आणि न्यायव्यवस्था यांच्याशी सामना करून सत्य जगासमोर आणतो. विद्रोह, वेदना आणि नकार हीच प्रल्हाद जाधव लिखित शेवंता जित्ती हाय या संहितेची मुख्यकथावस्तू व गाभा. 

इन्स्पेक्टर सयाजीराव कांबळे आणि कॉन्स्टेबल पिसाळ पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत. एक माणूस त्यांना भेटायला येतो आणि 'शेवंता जित्ती हाय' या ऐका वाक्यामुळे प्रेरित होऊन माणूस उर्फ शंकर जोशी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी येतो. पोलीस सुरुवातीला ही तक्रार स्वीकारत नाहीत. परंतु इस्पेक्टर कांबळे आणि त्यांचा एका खून खटल्यातील संशयित आरोपी व निर्दोष मुक्तता याचा संपूर्ण प्रवास माणूस त्यांच्यासमोर मांडतो. याची पुष्टी सयाजीराव कांबळे यांना त्यांच्या वरिष्ठांकडून देखील मिळते. तपास सुरू होतो.  पाटलांना हा माणूस अत्यंत शिताफीने पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो. तपासाअंती बाळासाहेब पाटील खंडेराजुरीकर यांनीच शेवंताचा खून केला हे स्पष्ट होतं. व्यवहारांमध्ये भावनांची किंमत शून्य असते , जर एखादा संवेदनशील माणूस न्यायमार्गाने हक्कासाठी लढत असेल तर त्यास न्याय मिळतोच याची खात्री आपणास पटते.

इन्स्पेक्टर सयाजीराव कांबळे (शंकर गवळी) माणूस/ शंकर जोशी (दत्ता वाघमारे)कॉन्स्टेबल पिसाळ (दिनेश बिरकुटे) बाळासाहेब पाटील खंडेराजुरीकर (सतीश मांदे) हे या नाटकातील प्रमुख पात्र. इन्स्पेक्टर कांबळे यांचा आवाज शेवटपर्यंत व्यवस्थित ऐकू आला नाही. संपूर्ण नाटकाची धुरा माणूस म्हणजेच दत्ता वाघमारे यांनी सांभाळली. सतीश माने यांनी देखील पाटील हे पात्र योग्यरीत्या रंगवण्याचा प्रयत्न केला. पिसाळ हे पात्र देखील गोंधळलेले दिसून आले. संहिता ही जमेची बाजू असल्यामुळे पात्रांनी देखील अभिनयावर मेहनत घेणे गरजेचे होते असे वाटते.

दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम यांनी पात्रांच्या अभिनयासह , तांत्रिक बाबींचा वेगळेपणाने विचार करणे गरजेचे होते असे वाटते. नेपथ्य( उमा निरसुडकर) पार्श्वसंगीत (मोहन खरात) रंगभूषा( भगवान बागल) वेशभूषा (मोहन नलावडे) प्रकाश योजना (दिनेश भंडारकवठेकर) या सर्व तांत्रिक बाबी प्रयोगास पूरक होत्या. 

काळानुरूप बदल होत जातात परंतु अन्यायाचे संदर्भात आजही तेच आहेत ही बाब आपणास या नाट्य कृतीमधून जाणवली असे मत प्रेक्षकांनी नोंदवले. 

प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर

Share