नाटक: फकिरा
लेखिका : सपना बावळे
दिग्दर्शक: स्वनिल बावळे
संस्था : स्वप्नील सपना लोककला विकास मंडळ, मानेगाव, ता. माढा, जि. सोलापूर

अन्यायाविरुद्ध लढणारा : फकिरा
Lokmat Epaper Link : Click on it
लोकशाहीर कै. अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीवर आधारित "फकिरा" हे नाटक. फकिरा म्हणणे "दलित साहित्यातील विद्रोही नायक". आपल्या वर होणाऱ्या अन्यायाला निमूटपणे सहन न करता प्रस्थापितांविरुद्ध लढा उभारणारा फकीरा. सपना मावळे यांनी 'फकीरा' या कादंबरीचे दोन अंकी नाटकात रूपांतर करून सादर केलेला हा प्रयोग.

स्वातंत्र्यपूर्व काळातील संपूर्ण परिस्थिती. प्रत्येक गाव त्याची संस्कृती आणि त्या गावची जत्रा गावच्या जत्रेची विशिष्ट पद्धत आणि मानपान. आपल्या गावात यात्रे अगोदर काढलेली मिरवणूक यातील मानाची खोबर्‍याची वाटी (जोगणी) जपून ठेवायची. दुसऱ्या गावच्या व्यक्तीने जर ही मानाची जोगणी पळवली तर गावाच्या शिवेच्या आत त्याचे मुंडके उडवायचं, आणि बाहेर गेला तर गावची यात्रा बंद. राणोजी (वामन बावळे) हा प्रयत्न करतो आणि आपला प्राण गमावून बसतो. फकीरा (राजू पवार) त्याचा बदला घ्यायचं ठरवतो. फकीरा ला मदत करण्यासाठी विष्णुपंत ( चन्नबसवेश्वर सोलापूरे),  दौलती ( भीमराव गंगधरे) आणि त्याचे सहकारी असतात.

बापू खोताने ( अलंकार वरवडकर) रानूला संपलेले असते. इंग्रजांच्या मदतीने बापू पाटील झालेला असतो याचा गैरफायदा घेऊन गावकऱ्यांना तो त्रास देतो.  फकीरा इंग्रजांचा खजिना लुटून आणि सर्वांना वाटतो. फकिराच्या घरच्यांना जेव्हा जेरबंद करण्यात येते. फकीरा इंग्रजांच्या स्वाधीन होतो, पण बापू खोताला संपवतो.  

या प्रयोगातील जमेच्या बाजू म्हणजे चोवीस कलावंत रंगमंचावर सादरीकरणात, त्रेचाळीस वादक "विविध वाद्य वादनात" सहभागी होते. त्यांच्या वादनाने संपूर्ण नाट्यग्रह दुमदुमून गेले होते .या सर्व वादकांनी राज्य नाट्य स्पर्धेत नोंदवलेला हा त्यांचा पहिला प्रयत्न. त्यांच्या प्रयत्नांना सलाम. 

राज्य नाट्य स्पर्धा मध्ये ही संस्था मागील पंधरा वर्षापासून आपला सहभाग नोंदवते आहे. स्पर्धा  म्हटलं की त्याचे निकष आले. त्या निकषानुसार रंगमंचीय संकेतानुसार जर किमान सादरीकरण झाले नाही, तर आपले प्रामाणिक प्रयत्न देखील तोकडे पडतात. नेपथ्य, प्रकाश योजना एन्ट्री एक्झिट, रंगमंचाचा योग्य वापर या सर्वच बाबींचा अधिक तपशीलवारपणे अभ्यास सादरीकरणात देखील होणे गरजेचे होते. 

शंभरपेक्षा अधिक कलावंत असणारी ही संस्था जर स्पर्धेचे निकषानुसार या राज्य नाट्य स्पर्धेत मध्ये सहभागी झाली असती तर सादरीकरण खूप उत्तम झाले असते असे वाटते. शंभरपेक्षा अधिक लोकांचे मेहनत काही निकषांमुळे जर मागे पडत असेल तर याचा विचार दिग्दर्शक स्वप्निल बावळे यांनी करावा अशी प्रतिक्रिया आणि खंत या कलावंताबद्दल प्रेक्षकांनी नोंदवली. 

प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर

Share