नाटक: डोंगरार्त
लेखिका: अपर्णा क्षेमकल्याणी
दिग्दर्शक: डॉ. मीरा शेंडगे
संस्था: रंगसंवाद प्रतिष्ठान, सोलापूर

स्त्री स्वातंत्र्याची आर्त साद : डोंगरार्त
Lokmat Epaper Link: Click on the link

आपला देश विविध धर्म,संस्कृती, भाषा याने समृद्ध. संस्कृती टिकवण्यात, प्रवाही ठेवण्यात स्त्रीयांचा मोलाचा वाटा. स्त्रियांना तरीही समाजामध्ये सन्मान मिळतोच असे नाही. वर्षानुवर्ष अन्याय होतच असतो फक्त त्याचे संदर्भ आणि परिभाषा ही प्रदेश आणि संस्कृतीनुसार बदलत राहतात. राजस्थानी संस्कृती व समाज जीवनामध्ये 'रुदाली' हा पुरुष प्रधान संस्कृतीमुळे मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेला एक वंचीत घटक. मुठीत काचा घट्ट आवळून इतरांच्या दुःखाचा भार हलका करणारी 'रुदाली' अशी यांची ओळख. त्यांचे दुःख, पिढ्यानपिढ्या होणारा अन्याय हा अपर्णा क्षेमकल्याणी यांनी या डोंगरार्त नाटकांमध्ये मांडला आहे.

मां (कल्पना जोशी), जलपा( वसुंधरा कुलकर्णी ), सावित्री( सावनी देशपांडे), मोरणी( मृगाक्षी कुलकर्णी), या रुदालीभोवती गुंफलेले हे नाटक. जलपा ही कुटुंब प्रमुख, अकाली पतीचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडते. एकटी स्त्री म्हटल्यानं नंतर समाजातील काही टपलेले लोक यांचे लचके तोडायला तयारच. या परिस्थितीचा सामना करत असताना जमीदार /  ठाकूर ( शहाजी भोसले) जलपा आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्रय देतो. जमीदार हा स्त्री केवळ भोगवस्तू हा दृष्टिकोन ठेवून जगणारा माणूस. यात जलपा आणि तिचे सर्व कुटुंब होरपळून निघते. यातच माणूस ( जहांगीर शेख) सारखे लोक त्रास देण्यास तयारच. 

जलपाची मुलगी मोरणी, तिचे लग्न सुद्धा जलपा एका वृद्ध व्यक्ती सोबत पैशासाठी लावून देते. परंतु त्याचा मंडपातच मृत्यू होतो. मोरणी जलपा व सावित्रीवरती चिडते. मला माझे पुढील शिक्षण पूर्ण करायचे आहे असा अट्टाहास धरते. जलपाला ही गोष्ट मंजूर नसते. तू फक्त परंपरागत रुदालीचे काम करायचे असे सुनावते.  तिची आजी व सावित्री तिच्या शिकण्यास पाठिंबा देतात. पण जमीदार मोरनीच्या मागे लागतो. जलपा जमीनदारास सर्व सत्य सांगते. मोरणी ही आपली मुलगी आहे हे पण सांगते.  परंतु ते ऐकण्यास तो तयार नसतो. मोरणी परिस्थितीचा हिमतीने प्रतिकार करते. जमीदारने अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती जमीनदारास संपवते. रुदालीचे पिढ्यानपिढ्या असणारे 'मुक रुदन' आपणास समोर अधिक गडद होत जाते. 

जलपा, सावित्री, मां आणि मोरणी यांनी आपापल्या भूमिका अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडल्या. जमीदार हा खलनायक शहाजी भोसले यांनी दमदारपणे साकारला.  सर्वांची खबर ठेवणारी लक्ष्मी ( वंदना प्रभु ) देखील सर्वांच्या लक्षात राहिली. राजस्थानी नृत्य व संगीत यांच्या प्रयोगातील सादरीकरणासाठी देखील सर्वच पात्रांनी यथोचित न्याय दिला. 

या प्रयोगामध्ये दिग्दर्शक डॉ.मीरा शेंडगे यांनी आपल्या दिग्दर्शनातून विविध बाजूचा अत्यंत व्यवस्थितपणे विचार केला आहे हे जाणवत होते. 
राजस्थानी लोक संगीताचा वापर, त्यांची गाणी नृत्य आणि रुदाली संस्कृती विविध वस्तू, मोजके बोली शब्द, पेहराव इ. बाबीमधून मधून अधोरेखित करण्यात आले.  राजस्थानी स्त्री, रुदाली, जमीदार यांची वेशभूषा, केशभूषा यावर घेतलेली मेहनत स्पष्टपणे दिसून येत होती.

दुसरा अंकातील पहिल्या दोन प्रवेशामध्ये नाटक काहीसे रेंगाळले. यामुळे नाटकाची गती व प्रभाव कमी झाला असे जाणवत होते.

नेपथ्यामध्ये मिहीका शेंडगे यांनी सायक्लोरामाचा वापर, डोंगर तेथील वावर डोंगरपायथ्याशी घर, जमीनदाराची प्रतीकात्मक हवेली यांची मांडणी  प्रभावी रित्या केली होती. उमेश बटाने यांची प्रकाश योजना, विक्रम बर्डे यांचे संगीत या सर्व तांत्रिक बाबींमुळे प्रयोग प्रभावी झाला. 

राज्य नाट्यस्पर्धेमधील एक नाविन्यपूर्ण प्रयोग डोंगरार्तच्या माध्यमातून सादर झाला,अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी नोंदवली. 

प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर 
संगमेश्वर कॉलेज सोलापूर

Share