नाटक: रंग्या रंगीला रे
लेखक: योगेश सोमण
दिग्दर्शक: व्यंकटेश रंगम
संस्था: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सोलापूर.

गोंधळलेला : रंग्या रंगीला रे
LOKMAT EPAPER LINK: Click on the link
बहारदार पात्र आणि  रंगतदार लीलांनी रंग्याने घातलेला धुमाकूळ म्हणजे रंग्या रंगीला रे. समोरच्या व्यक्तीला अगदी सहजपणे आपल्या बोलण्यात गुरफटवून टाकणारा रंग्या.  कधी वडील, कधी नौकर,कधी इन्स्पेक्टर तर कधी प्रियकर अशा बहुढंगी आणि बहुरंगी स्वरूपात आपल्यासमोर येतो. रंग्याच्या सर्व करामती आपल्या सिद्धहस्त लेखनीतून उतरवल्या आहेत योगेश सोमण यांनी.  विनोदी नाटक करू इच्छिणार्‍या कोणत्याही व्यक्तीस मोहात टाकणारी ही संहिता.

रंग्या (व्यंकटेश रंगम )आणि त्याची मैत्रीण सीमा (श्रेया माशाळ) गेस्ट हाऊसवर मालकास न सांगता राहत असतात. गेस्ट हाऊस मालक त्यांच्या काका (अरविंद आंदोरे) -काकूंना (अश्विनी कुलकर्णी) सुट्ट्यांसाठी या ठिकाणी पाठवतो. सीमा गेस्ट हाउसच्या एका फोन कॉलला उत्तर देत असताना आणखी एका जोडप्यास प्रकाश (आनंद आंदोरे)आणि पूजा (अनिता कुलकर्णी) यांना बोलावते. यामुळे निर्माण होणारा गोंधळ रंग्याने रंगतदारपणे रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. व्यंकटेश रंगम यांनी रंगवलेली नौकर, त्याचे वडील, पोलीस इन्स्पेक्टर आणि सीमाचे डॅडी विविध पात्र आणि त्यांनी निर्माण रंजकता यामुळे नाटक अधिक रंगतदार होते, पण प्रत्येक भूमिकेस न्याय मिळलाच असे नाही. शेवटी रंग्याचे खरे रंग सर्वांना समजतात.

राज्य नाट्य स्पर्धा 'हौशी' का म्हणतात याचा प्रत्यय आपणास हा प्रयोग पाहताना आला. दमदार संहिता असतानाही त्याचा परिणाम मात्र साधला गेला नाही. काही अंशी, सीमा, काका आणि काकू यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला. 
प्रकाश आणि पूजा यांनी अधिक मेहनत घेणे गरजेचे होते. दार बंद करणे, उघडणे, एन्ट्री आणि एक्झीट यांचा उडालेला गोंधळ, प्रत्येक भूमिकेचे बारकावे अधिक स्पष्टपणे येणे रंग्याच्या भूमीकेसाठी अपेक्षित होते असे वाटते. स्पर्धेचा प्रयोग सादर करत असताना अभिनय, पात्रांची निवड, त्यांचे वय हा महत्त्वाचा निकष असतो. सादरीकरण उत्तम झाले तर या गोष्टींकडे दुर्लक्ष ही करता येते.

दिग्दर्शक व्यंकटेश रंगम यांनी सादरीकरणातील बारकाव्यांसह, नेपथ्य (सुमित / श्रावण डावरे), प्रकाश योजना (जयप्रकाश कुलकर्णी), वेशभूषा (अश्विनी गोसावी ), रंगभूषा (ओमप्रकाश श्रावण) आणि संगीत (साईनाथ ताटे) याकडेही लक्ष देणे गरजेचे होते.  नेपथ्य रचना वावरासाठी अडचणीची ठरत होती. रंग्याच्या वेशभूषेसाठी वेगळा विचार होणे गरजेचे होते असे वाटते. प्रकाश योजनेमध्ये बऱ्याच वेळा मुख्य पात्र अंधारात होती. संगीतामध्ये केवळ एकच गाणे वारंवार वापरण्यात आले. तांत्रिक बाबींचा एकत्रित परिणाम प्रयोगामधून साधता आला नाही असेच म्हणावे लागेल.

राज्य नाट्य स्पर्धामध्ये एक चांगला प्रयोग सादर होता होता राहिला अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी नोंदवली. 

प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर

Share