नाटक: पाऊसपाड्या
लेखक: आदिल शेख
दिग्दर्शक: सागर देवकुळे
संस्था: संकल्प युथ फौंडेशन, सोलापूर
संवेदनेची नवीन परिभाषा : पाऊसपाड्या
Lokmat Epaper Link: Click on the link.
संवेदनशील व्यक्ती आपल्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून वा अभिजातकलेच्या माध्यमातून आपलं जगणं समृद्ध करत असते. व्यक्तीचे जगणं सुंदर तेव्हा होतं, जेव्हा त्याच्या आयुष्यातील जवळच्या व्यक्ती त्याला समजून घेतात. रक्ताच्या नात्यापेक्षा, मैत्री किंवा मानलेली नाती जगण अधिक समृद्ध करतात. सौंदर्याची परिभाषा ज्यांनी बदलणे ते सर्वजण त्यांच्या दृष्टीने जग पाहत होते. 'पाऊसपाड्या' देखील असाच संवेदनशील आणि स्वतंत्र जीवन जगणारा विचार. त्याच्या आयुष्यातील नाती सत्यातून कल्पनेत आणि कल्पनेतून सत्यात कशी अवतरत जातात याचा मोहक प्रवास म्हणजे पाऊसपाड्या. आदिल शेख यांनी आपल्या संहितेमधून वर्तमानाचे भान ठेवून निर्माण केलेले पाऊसपाड्याचं जग लोभसवाणं ठरतं आणि भावत देखील.
पाऊसपाड्या (ओंकार साठे) आपल् कलंदर आयुष्य जगतो आहे. एक संवेदनशील कलावंत, व्यंगचित्रकार श्रीपाद (सागर देवकुळे) त्याच्या आयुष्यावर ती एक व्यंगचित्र मालिका स्पर्धेसाठी रेखांकित करणार आहे. श्रीपाद पाऊसपाड्याच्या मदतीने आयुष्याचा वेगळ्या पद्धतीने शोध घेत जातो, त्याचे अर्थ कधी वेदनेतून तर कधी विनोदी पद्धतीने आपणासमोर हे दोघे उलगडत नेतात.
पाऊसपाड्या त्याच्या जगण्याचं तत्वज्ञान, त्याच्या विविध अनुभवातून श्रीपादला सांगतो. आई वेश्या वस्तीत, वडील माहीत नाहीत,अचानक आई गेल्यानंतर आलेली जबाबदारी, त्यात लहान बहीण सोबत आणि जगण्याचे विखारी अनुभव हा वेदनादायी प्रवास श्रीपाद देखील त्याच्या अनुभव कथनातून अनुभवतो.
ओंकार साठे याचा पाऊसपाड्या आपणास राजकपूरची आठवण करून देतो. कलंदर आणि भणंग आयुष्य जगणारी व्यक्ती इतरांना मात्र आपल्या पद्धतीने भरभरून देत जाते. भूक, पाऊस, पाणी आणि मुलभूत गरजा पूर्ण करता येणं हेच पाऊसपाड्याच खर जगणं. पण हे त्याच जग जेव्हा केवळ कल्पनेने उभं केलेलं आहे. सत्यात कोणीही नाही, हे पाहून श्रीपाद अंतर्बाह्य हादरून जातो. पण स्वीकारतो त्याचा संकल्प "अभिजात कला निर्मितीचा आणि जगणं समृद्ध करण्याचा".
पाऊसपाड्याची बहीण खारु ( धनश्री कोल्हापुरे ) आणि त्याचे सखेसोबती म्हणजे संतु ( अभिजीत दुपारगुडे ) वडिलांच्या आत्महत्येनंतर मुंबईत आलेला, बबडी (चित्रांगदा निकंबे), अत्याचारस बळी पडलेली,कामवाली, पाऊसपाड्यावर प्रेम करणारी आणि त्याचा घराचं घरपण सांभाळणारी, गुड्डू ( मेहबूब शेख ) जन्मानेच बुटका पण आयुष्याची शिखरे यशस्वीपणे पादाक्रांत करणारा, लक्षु ( प्रतीक कसबे) जन्माने मतिमंद परंतु भावना समजणारा, नंदिनी (मनस्वी वाघमारे ) निसर्ग वेडी एक दिवस त्यातच इतिहास जमा होते , इसम एक (ओमप्रकाश साळुंखे), इसम दोन (सिद्धांत जेउरे) यांनी प्रसंगानुरूप दारुड्या, दंगलीतील हल्लेखोर अशा भूमिका प्रभावीपणे अभिनित केल्या. समूहांमध्ये असणाऱ्या पाच ते सहा मुली देखील भाव खाऊन गेल्या.
दिग्दर्शक सागर देवकुळे यांनी अभिनयापासून वेशभूषेपर्यंत प्रत्येक तांत्रिकबाबीचा व्यवस्थितरीत्या विचार केला होता हे प्रयोगाच्या सादरीकरणात मधून दिसून आले. संतोष फुलारी यांची प्रकाश योजना त्यामध्ये केलेला गिमिक्सचा वापर हा संहितेस पूरक होता. समुद्र किनारा, डोंगर, बॅटरीचा वापर, इसम प्रसंग आणि "आई" हा हळवा कोपरा प्रकाश योजनेच्या माध्यमातून अधिक गडद झाला. वैष्णवी व्हनखडे यांनी निवडलेल्या सुरावटी या नाटकाचे अंतरंग अधोरेखित करत होते. मुंबईतील छोटेखानी फ्लॅट ,खिडकी, सायकलचा उत्तम वापर आणि विविध प्रसंगांसाठी अनुरूप नेपथ्य रचना सोमनाथ लोखंडे यांनी केली होती. रजनी कोल्हापुरे आणि ज्योती पुजारी यांनी पाऊसपाड्या, खारु, आणि इतर पात्रांच्या वेशभूषा यावरती विशेष घेतलेली मेहनत दिसून आली. विजयलक्ष्मी श्रावण यांची रंगभूषा ही प्रयोगास पूरक ठरली.
संवेदनशील माणूस आपल्या जगण्यामधून सभोवतालचे वातावरण प्रफुल्लित करून टाकतो. विविध कला, संगीत, साहित्य निर्मिती किंवा या जगाचं सौंदर्य वाढवण्यामध्ये संवेदनशील माणसाचे योगदान मोलाचं आहे. आजचा पाऊसपाड्या हा स्पर्धेतील सर्वार्थाने एक चांगला प्रयोग आम्ही अनुभवला अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी नोंदवली.
प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर
Share
छान
ReplyDelete🔥🔥
ReplyDelete